Rahuri Constituency : नगर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे राहुरी विधानसभा (Rahuri Constituency) मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केलीय. त्यानुसार सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपने मोठ्या उत्साहात आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून अजूनही कोणाचे नाव जाहीर झालेले नाही. ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार, कर्डिलेंच्या विरोधात कोण उमेदवार असणार यावर राजकीय कयास लावले जात आहेत.
नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
शिव निर्धार यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा
राहुरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्यापूर्वीपासून अक्षय कर्डिले यांनी शिव निर्धार यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडविला आहे. यातच काल (ता. २) भाजपने अक्षय कर्डिले हेच उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचारात बळ मिळालेय. अक्षय कर्डिले यांनी आज अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण येथे जाऊन जंगले महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. बुऱ्हाणनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा गाजली. कर्डिलेंनी प्रचाराचा धुरळा उडवून दिलेला असताना त्यांच्या विरोधी गटात मात्र, संभ्रम जाणवत आहे. महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद (Rahuri Constituency)
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अवघ्या १४ दिवसांत अक्षय कर्डिले यांनी जनता दरबार घेण्यास सुरूवात केली. या जनता दरबाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा पासून राहुरी पोटनिवडणूक अक्षय कर्डिले लढविणार अशी चर्चा होती. मागील एक महिन्यापूर्वीच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अक्षय कर्डिले हेच भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट केले होते. अक्षय कर्डिले यांनी त्यानुसार जनतेच्या गाठीभेटी घेण्यासाठी शिव निर्धार यात्रा सुरू केली. या यात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कर्डिले यांच्याकडे शिवाजीराव कर्डिले यांचे उत्तराधिकारी म्हणून सहानुभूतीने पाहिले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात सहानुभूतीची लाट असल्याचे नागरिक सांगतात.
राजकीय चर्चा रंगल्या
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार की अपक्ष निवडणूक लढविणार हे अजूनही अस्पष्ट आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तनपुरे यांनी राजकीय भूमिका बदलत हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याने महाविकास आघाडीला त्यांची नवी भूमिका रुचेल का? की तनपुरेंना भूमिका बदलावी लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. या मतदारसंघात हिंदुत्वाच्या मुद्दा घेऊन शिवाजीराव कर्डिले यांनी २०२४ची निवडणूक जिंकली होती. अक्षय कर्डिले यांनीही हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मागील काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरेही हिंदुत्वाची भूमिका घेऊन मतदारसंघात दिसत आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडी हिंदुत्वाच्या मुद्द्याला कसे काउंटर करणार यावर राजकीय चर्चा रंगल्या आहेत. निवडणूक जाहीर होताच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरीचेही संकेत दिले आहेत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर चर्चा रंगली आहे.



