
Bhuikot Fort : नगर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याच्या (Bhuikot Fort) सर्वांगीण विकासासाठी आज (ता. १) जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर आणि लष्कर प्रशासन (Military Administration) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नांतून हा करार झाला आहे. या करारामुळे भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नक्की वाचा : शहरात वाहनांच्या काचांना सर्रास काळी फिल्म; नियम मोडणाऱ्यांना कुणाचे अभय?

जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू
स्टेशन हेडक्वार्टर, अहिल्यानगर येथे ब्रिगेडियर सुनील कुमार, स्टेशन कमांडर, स्टेशन हेडक्वार्टर, अहिल्यानगर आणि डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या उपस्थितीत आज (ता. १) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी दीपक दातीर, जिल्हा नियोजन अधिकारी आणि सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. किल्ल्याच्या संवर्धनासोबतच परिसराचा नियोजनबद्ध विकास, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या विविध शक्यतांचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या सामंजस्य करारामुळे विकासकामांसाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार (Bhuikot Fort )
भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करत त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. किल्ल्याच्या विकासामुळे स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. परिणामी स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होण्यासही मदत होणार आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, त्यांचा योग्य पद्धतीने विकास आणि भावी पिढ्यांसाठी हा वारसा सुरक्षित ठेवणे, यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना या करारामुळे पाठबळ मिळणार आहे. भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने झालेला हा सामंजस्य करार अहिल्यानगरच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


