
Dr. Rajendra Pipada : राहाता : शहरातील वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, खुनाच्या घटना, चोरी, दरोडे, अवैध धंदे तसेच पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण (Nitin Chavan) यांच्या निष्क्रिय कारभाराविरोधात भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत राहात्यातील गुन्हेगारीच्या बाबतीत तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नक्की वाचा : कर्जत बसस्थानकाचे सिमेंट काँक्रीटीकरणाने रुपडे पालटले; कर्जतकरांची मागणी पूर्ण
चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
यावेळी डॉ. पिपाडा यांनी राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “सामान्य नागरिक तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात जातो, मात्र त्यालाच आरोपीप्रमाणे वागणूक दिली जाते. गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि पोलीस निरीक्षक चव्हाण मात्र निष्क्रिय बनले आहे,” असा संतप्त आरोप त्यांनी केला. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण हे जनतेशी उद्धटपणे वागत असून त्यांच्या निष्क्रियतेमुळेच राहाता शहरात गुन्हेगारी वाढीस लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस निरिक्षकांना कुठलीच संवेदना नाही (Dr. Rajendra Pipada)
डॉ. पिपाडा यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट शब्दांत नमूद केले की, राहाता शहरात काही दिवसापुर्वी अत्यंत संतापजनक घटना घडली ओंकार गायकवाड या १३ वर्षाच्या मुलाच्या पोटावर गाडी घालून त्याला चिरडून मारले. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली त्याची साधी दखलही पोलीस निरिक्षकांनी घेतली नाही. दोन दिवस गुन्हाही दाखल झाला नाही. जेव्हा नातेवाईक व ग्रामस्थ त्या मुलाचा मृतदेह घेऊन आंदोलन केले तेंव्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही अतिशय धक्कादायक बाब असून पोलीस निरिक्षकांना कुठलीच संवेदना नाही. राहाता तालुक्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीने अक्षरशः डोके वर काढले असून सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. महिला अत्याचार, छेडछाड, घरफोड्या, दरोडे, अवैध दारू विक्री, मटका, गुटखा तस्करी, मोबाईल चोरी, खिसेकापू टोळ्या तसेच दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक चोरीच्या घटनांमध्ये फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
डॉ. पिपाडा म्हणाले की
डॉ. पिपाडा म्हणाले की, “राहाता-शिर्डी परिसर हा धार्मिकदृष्ट्या देशभरात महत्त्वाचा असून येथे दररोज हजारो भाविक येत असतात. अशा ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडणे ही अत्यंत गंभीर व लज्जास्पद बाब आहे. महिलांना रस्त्यावर सुरक्षितता नाही, व्यापाऱ्यांना चोरीची भीती आहे, शेतकरी असुरक्षित आहेत आणि युवकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर जनआंदोलन उभारावे लागेल.” महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन व छेडछाडीच्या घटना सातत्याने वाढत असून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी अनेक भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र असल्याने महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
अवैध धंदे तत्काळ बंद करावे
यावेळी डॉ. पिपाडा यांनी राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यशैलीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राहाता शहरात विशेष गुन्हे प्रतिबंधक मोहीम राबवून अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके नियुक्त करावीत, रात्रीची गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या तक्रारी तातडीने नोंदवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.


