Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडीत भव्य कार्यक्रमांची रेलचेल

Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडीत भव्य कार्यक्रमांची रेलचेल

0
Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडीत भव्य कार्यक्रमांची रेलचेल
Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडीत भव्य कार्यक्रमांची रेलचेल


१२०० कोटींच्या शिल्पसृष्टी विकास आराखड्याचे भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांची उपस्थिती

Punyashlok Ahilya Devi Holkar : नगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी (Chaundi), ता. जामखेड येथे दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय भव्य-दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दोन दिवस चालणाऱ्या या जयंती महोत्सवात सांस्कृतिक, ऐतिहासिक व विकासात्मक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे सभापती आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत, हा सोहळा राज्याच्या सांस्कृतिक इतिहासातील अविस्मरणीय पर्व ठरणार असल्याचे सांगितले.

नक्की वाचा : सुजय विखे यांच्यासह सत्यजित कदम, भानुदास बेरड, वसंत लोढा विधान परिषदेसाठी इच्छुक

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्राताई पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंकजाताई मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दत्तात्रय भरणे, अतुल सावे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा सहभाग राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, (Punyashlok Ahilya Devi Holkar)

राज्य शासनाने ६ मे २०२५ रोजी चोंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या बैठकीत चोंडी येथे उभारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टीच्या तब्बल १२०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. याच विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विविध कामांचे भूमिपूजन जयंती दिनी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. त्यामुळे चोंडीच्या विकासाला नवे ऐतिहासिक वळण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दि. ३० मे रोजी जयंतीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होणार असून, रात्री ८ ते ११ या वेळेत देशातील सुप्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कवी संमेलन रंगणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कवी संमेलनात कवयित्री नेहा गोधटे, डॉ. भुवन मोहिनी, शिखा अवधेश, साक्षी तिवारी, सानिया राय आणि शारदा पोफडी या मान्यवर कवयित्री सहभागी होणार असून, देशभक्ती, सामाजिक जाणिवा आणि संस्कृतीचा संगम असलेली काव्य मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.


कवी संमेलनानंतर रात्री ११ ते ११.३० या वेळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन शो सादर करण्यात येणार आहे. या शोमध्ये देशातील प्रख्यात शिवमंदिरे, जेजुरी गड, चोंडी स्मारकाचे डिझाईन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा भव्य जीवनपट आकाशात साकारला जाणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजता जयंतीनिमित्त आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार असून, संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघणार आहे.


दि. ३१ मे रोजी सकाळी ११.१० ते ११.५० या वेळेत नियोजित शिल्पसृष्टीच्या विकास आराखड्यातील विविध कामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. या भूमिपूजनामुळे चोंडी हे ठिकाण भविष्यात जागतिक पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याचा विश्वास प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.


यानंतर दुपारी १२ ते २.३० या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज्यातील विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असून, अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजकारण, न्यायव्यवस्था, महिला सक्षमीकरण, धर्मसंवर्धन आणि लोककल्याणकारी राज्यकारभार या क्षेत्रात अहिल्यादेवींनी दिलेला आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात येणार आहे.


पत्रकार परिषदेत प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा गौरव सोहळा आहे. चोंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान असल्यामुळे या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सहकार्याने हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक, समाजबांधव व भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, विविध विभाग तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले असून, येणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक, पार्किंग, पिण्याचे पाणी, निवास व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित हा राज्यस्तरीय महोत्सव ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, चोंडी नगरी दोन दिवस राज्याच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्रबिंदू ठरणार आहे.