Maharashtra industry : नगर : राज्यातील 36 हजार 211 कंपन्या बंद पडल्यामुळे सध्या राज्यात राजकीय वाद-चर्चा, आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांमधून यावर टीका केली असून यावर सत्ताधारी नेत्यांनीही उत्तरे दिली आहेत. आता हा वाद थेट ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यातून या विषयावर टीका केली आहे. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देत पवार यांचे मुद्दे खोडून काढले आहेत. या वादात आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही उडी घेत फडणवीस यांना प्रतिप्रश्न केले आहेत.
नक्की वाचा : अकोला शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाथर्डी तालुक्यात खळबळ
शरद पवार यांनी म्हटले की
संसदेत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात केंद्र सरकाने या महाराष्ट्रातील या कंपन्या बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यावरून हे रान पेटले आहे. यावर शरद पवार यांनी म्हटले की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. असे पवार यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी चाकण येथील कंपन्यांच्या स्थलांतराचा मुद्दाही मांडला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वस्तुस्थिती सांगणे आवश्यक (Maharashtra industry)
याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये यासाठी वस्तुस्थिती सांगणे आवश्यक आहे. मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो, असे सांगून फडणवीस यांनी आरोप फेटाळले आहेत.
२७,००० कंपन्या डिसफंक्शनल
ही चर्चा सुरू असताना आमदार रोहित पवार यांनीही यावर पोस्ट केली आहे, त्यांनी म्हटले आहे की, शब्दांचा आणि डेटाचा खेळ करण्यात आपला हात कुणीही धरू शकत नाही; पण आपली पोस्ट वाचल्यानंतर, सोयीचा अर्थ लावण्यातही कुणी आपला हात धरू शकत नाही, हे मान्य करावं लागेल. आपल्या म्हणण्यानुसार, त्यापैकी ७६% कंपन्या म्हणजे सुमारे २७,००० कंपन्या डिसफंक्शनल झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या डिसफंक्शनल का झाल्या? याचं उत्तर शोधणं मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी नाही का? कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत, तर हे आपल्या धोरणांचं अपयश नाही का? उर्वरित ९,००० कंपन्यांचं काय? त्या का बंद पडल्या, याचाही विचार करायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.



