Ahilyanagar : नगर : महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना अधिक गती व सुसूत्रता मिळावी तसेच त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्यात ‘महिला व बाल विकास भवन’ (अहिल्याभवन ) उभारणीस मान्यता मिळाल्याने वेग आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूक्ष्म नियोजनातून तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली असून, एकाच छताखाली तब्बल १३ विभागांची कार्यालये आणि सुमारे ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : अक्षय कर्डिलेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीत घेणार जाहीर सभा
महिला व बालविकास विभागांतर्गत विविध योजना जिल्ह्यात स्वतंत्रपणे कार्यरत असल्या तरी त्यांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ, श्रम आणि संसाधनांचा अपव्यय होत होता. या पार्श्वभूमीवर सर्व सेवा ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘अहिल्याभवन’ या संकल्पनेतून उभारण्यात येणारे हे केंद्र महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
विविध विभागांची कार्यालये (Ahilyanagar)
या भवनामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग, बाल विकास प्रकल्प कार्यालये, चाईल्ड हेल्पलाईन, बाल न्याय मंडळ, महिला सक्षमीकरण केंद्र आदी विविध विभागांची कार्यालये कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत या भवनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच जागा निश्चित करण्यात आल्यामुळे नागरिकांना सहज पोहोचता येईल, अशी सोय करण्यात आली आहे.
नक्की पहा : पगारावरचे चोर! सुशिक्षित हातांना कामाऐवजी मिळालं ‘चोरीचं’ टार्गेट
सर्व सेवा एकाच ठिकाणी (Ahilyanagar)
महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी ही पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण, पोषण, शिक्षण आणि सुरक्षितता या क्षेत्रांत अधिक समन्वय साधता येणार असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार आहे. महिला व बाल विकास भवन अहिल्याभवन उभारणीमुळे विभागातील सर्व सेवा एकत्रितपणे उपलब्ध होतील. नागरिकांना एका ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्याने त्यांचा वेळ वाचेल आणि योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळेल. हे भवन महिला सक्षमीकरणासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरेल.



