FDA : नगर : महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात सातत्याने कारवाई सुरू असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चुकीचे पंचनामे केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी एकतर्फी कारवाई न करत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना
काय म्हणाले सुजय विखे?
“काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव आणून चुकीचे पंचनामे केले जात आहेत. सगळीच दूध संकलन केंद्रे जर बंद झाली तर शेतकऱ्याचे उत्पन्न देखील बंद होणार आहे. एकतर्फी कारवाई करून चालणार नाही.” असे वक्तव्य विखे यांनी केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दूध भेसळ तसेच बनावट दूध प्रकरणांमध्ये FDA च्या पथकांनी गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, बीड आणि इतर भागांत अशा कारवायांमध्ये हजारो लिटर दूध नष्ट करण्यात आले असून, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवायांमुळे दूध संकलन केंद्रांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दूध संकलन केंद्र चालवणारे आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विखेंची भूमिका (FDA)
डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, भेसळ रोखणे हे सर्वोच्च प्राधान्य असले तरी त्याची अंमलबजावणी संतुलित आणि न्याय्य पद्धतीने व्हायला हवी. “अधिकाऱ्यांवर दबाव आणून चुकीचे पंचनामे करणे हे अयोग्य आहे. यामुळे शेतकरीही अडचणीत येत आहेत,” असे ते म्हणाले. दूध हे शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. जर सर्व दूध संकलन केंद्रे बंद पडली तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल. अशी भूमिका विखे यांनी मांडली.



