Fire : अकोले : तालुक्यातील वीरगाव येथे १९६१ साली उभारण्यात आलेली ‘समाज मंदिर’ ही इमारत मंगळवारी (दि.२८) सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाली. उष्णतेची तीव्रता आणि परिसरातील कोरडे वातावरण यामुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा : खासदार निलेश लंकेंचा मोठा गौप्यस्फोट; ‘ती’ केवळ गुगली, २०२९ ला पुन्हा लोकसभेच्याच मैदानात
मोठी जीवितहानी टळली
या इमारतीमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाचा एक वर्ग भरत असल्याने, सुदैवाने घटना घडली तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी शैक्षणिक साहित्य आणि इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, उपसरपंच संजय थोरात, ग्रामपंचायत सदस्य यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिकांनी पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अकोले नगरपंचायतीच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
नक्की पहा : वीरगाव येथील ‘समाज मंदिराला आग; शाळेचा वर्ग आगीच्या भक्ष्यस्थानी
गावात हळहळ (Fire)
या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा ही इमारत दुरुस्त करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.



