
Maharashtra TET Scam 2026 | ठाणे: देशात पेपरफुटीच्या (TET Paper Leak) प्रकरणांमध्ये महाराष्ट्र आता दुर्दैवाने दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा गंभीर आरोप करत चालू पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी थेट विधानसभेत सरकारला धारेवर धरले आहे. NEET परीक्षेत पकडलेल्या ११ पैकी ७ आरोपी महाराष्ट्रातले निघत असतानाच, आता ६ लाखांहून अधिक प्रामाणिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळणारा ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा पेपर अवघ्या २४ तास आधी लीक झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या आंतरराज्यीय रॅकेटचा छडा (Agra Connection) लावण्यासाठी ठाणे पोलिसांचे ‘SIT’ पथक आता देशातील ४ राज्यांमध्ये दाखल झाले आहे. (Maharashtra TET Scam 2026)
हे वाचा – मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे : सुधीर पाटील
विधिमंडळात विरोधक आक्रमक
राज्याबाहेर पेपर छापण्याच्या कंत्राट पद्धतीवर बोट ठेवत विरोधी नेत्यांनी सरकारला घेरले आहे. “गोपनीयता राखण्यासाठी आग्र्यात पेपर छापले जात होते, तर मग थेट प्रिंटिंग प्रेसमधूनच, म्हणजेच मूळ ‘सोर्स’वरूनच प्रश्नपत्रिका कशी चोरीला गेली? छपाई करणाऱ्या त्या खाजगी कंपनीला कुणाचे अभय होते?” असे प्रश्न विचारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे. रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांच्या कष्टाचा हा बाजार कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नक्की पहा : ६ लाख प्रामाणिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळ! TET पेपर चक्क प्रिंटिंग प्रेसमधूनच लीक?
‘बोगस ग्राहक’ बनून पोलिसांनी केला पर्दाफाश
या महाघोटाळ्याचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने केला. पोलिसांनी चक्क ‘बोगस ग्राहक’ (डमी उमेदवार) बनून या टोळीशी संपर्क साधला होता. मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र आणि गणित अशा ४ प्रश्नपत्रिकांसाठी या टोळीने तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर २५ लाखांचा ॲडव्हान्स घेताना भिवंडीच्या कोणगाव येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना रंगेहात अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
राजीव शाह (४५ वर्षे) – पाटणा, बिहार
आकाश कुमार (३० वर्षे) – पाटणा, बिहार
धीरज सिंग (२८ वर्षे) – पानिपत, हरियाणा
(चौथा आरोपी कपिल दहिया हा पुण्यातून थेट दिल्लीला पळून जाण्यात यशस्वी ठरला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.)
काय आहे हे ‘आग्रा कनेक्शन’?
तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचे ‘आग्रा कनेक्शन’! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) टीईटीचे पेपर छापण्याचे कंत्राट उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या ‘महीम पत्रम् प्रायव्हेट लिमिटेड’ (Mahim Patram Pvt Ltd) या कंपनीला दिले होते. विशेष म्हणजे, ही कंपनी गेल्या २५ वर्षांपासून परीक्षा परिषदेचे पेपर छापत आहे.
परीक्षा सुरू होण्याच्या ३० ते ४५ दिवस आधी हा पेपर छपाईसाठी आणि उर्दू, इंग्रजी, हिंदी भाषांतरासाठी आग्र्याला पाठवला गेला होता. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकांवर जे विशेष ‘QR Codes’ मिळाले, त्यावरून हा पेपर वाशीम, जालना आणि लातूर या जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रांसाठी छापला गेला होता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पेपर वाहतुकीदरम्यान लीक झाला की थेट आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमधूनच गायब करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक आग्र्यात ठाण मांडून बसले आहे.
२५ वर्षांपासूचा मास्टरमाइंड ‘विजेंद्र गुप्ता’
हेही वाचा : ३५ फूट उंच झाडावर लटकलेल्या कावळ्याची थरारक सुटका; अमित गायकवाड यांचे धाडस
या संपूर्ण आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार उर्फ विजेंद्र गुप्ता (४४ वर्षे) हा आहे. हा मूळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असून दिल्ली आणि हरियाणातून हे रॅकेट चालवतो. गेल्या २५ वर्षांत ओडिसा JEE घोटाळा, मध्य प्रदेश आणि बिहारमधील तब्बल २० पेक्षा जास्त पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये विजेंद्र गुप्ता मुख्य आरोपी आहे. विजेंद्रनेच या सर्व एजंट्सना महाराष्ट्रात पाठवले होते आणि प्रत्येक पेपर २ ते ३ लाख रुपयांना उमेदवारांना विकून कोट्यवधी रुपये कमावण्याचा या टोळीचा डाव होता.
मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई होणार?
नक्की पहा : भारतात 40-42 अंश पचवणारे आपण, मग युरोपमध्ये 40 अंशांचा हाहाकार का?
लाखो प्रामाणिक उमेदवारांच्या भविष्याचा बाजार मांडणाऱ्या या ‘महीम पत्रम्’ प्रिंटिंग प्रेसवर आणि मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्तावर महाराष्ट्र सरकार आता ‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाई करणार का? आणि विरोधकांनी विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांवर सरकार काय ठोस पाऊल उचलणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


