Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. मात्र आता त्यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील (Azad Maidan) उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर पोहोचलेत.अवघ्या काही तासांत ते मुंबईत दाखल होणार होते. त्याआधीच मुंबई पोलिसांनी पत्र लिहून त्यांना उपोषण करण्यास परवानगी देण्यास नकार दर्शवला आहे.

नक्की वाचा : नगर जिल्ह्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाही (Manoj Jarange)

मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं.आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. आझाद मैदान पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहून आझाद मैदान उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्यामध्ये त्यांनी काही कारणेही दिली आहेत.

अवश्य वाचा : प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवरायांचा चित्ररथ

मुंबई पोलिसांच्या पत्रात काय ? (Manoj Jarange)

१. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे विविध वित्तीय संस्था,वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत.येथे दररोज ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतूकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. त्यामुळे मराठा आंदोलक हे मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार आहे.

२. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत.

३. मराठा आंदोलकांनी लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

४. मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयी सुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर या मोर्चाचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठया संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. हे आंदोलन हे अनिश्चित काळासाठी त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.

५. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हास आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस कळविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर२९, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील.त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी असं सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालय यांनी आंदोलनकर्त्यासाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत पालन आपण रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर करणे अनिवार्य आहे. त्याचे पालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांची अवमानना होईल याची नोंद घ्यावी, असं देखील या पत्रात नमूद केले आहे.

हेही पहा : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here