
Pathardi Marketplace पाथर्डी : शहरातील बाजारपेठेची (Pathardi Marketplace) दिवसेंदिवस दुरावस्था होत असून व्यापारी वर्गाला अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी आता एकवटले असून बाजारपेठेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे (Municipal Council Administration) विविध मागण्यांसाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. या मागण्यांसंदर्भात गुरुवारी (ता. २१) नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासन आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.
नक्की वाचा : देवळाली प्रवरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसा कारवाई

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था, अनधिकृत फेरीवाले, रस्त्यावर पसारा टाकून करणारे छोट्या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र बाजारतळ विकसित करणे, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शिस्तबद्ध उपाययोजना करणे, तसेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आदी मागण्या व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बैठकीत सविस्तर चर्चा (Pathardi Marketplace)
शहरातील नवी पेठ, क्रांती चौक, कोरडगाव चौक, उर्दू शाळा परिसर, मेन रोड, अजंठा चौक, नाईक चौक या भागांमध्ये वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी समस्या आणि ग्राहकांना होणारा त्रास यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः नवी पेठेत स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली.व्यावसायिक राजेंद्र शेवाळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत शहराची बाजारपेठ दिवसेंदिवस ओस पडत असल्याचे सांगितले.
वाहतूक कोंडी वाढत असल्याचे नमूद
ग्राहक पाथर्डी बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहेत. नगरपरिषदेकडून प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आठ दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास पाथर्डी बंद आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील चिंचपूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर हातगाडे व फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्व फेरीवाल्यांना भाजी मार्केट तळावर स्थलांतरित करून तेथे स्वतंत्र मार्केट उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी नगरपरिषदेने फिरते अतिक्रमण पथक स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक जखमी
याशिवाय शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दररोज हजारो नागरिक व महिला विविध कामानिमित्त शहरात येत असतानाही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक जखमी होत असल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.शहरातील काही भागांतील अस्वच्छता, रस्त्यांवरील कचरा आणि दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक अमोल गर्जे, बंडूशेठ बोरुडे पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधून मागण्यांवर सकारात्मक पाठपुरावा केला जाईल , असे आश्वासन दिल्यानंतर बैठक संपन्न झाली.
दोन्ही बाजूंनी पार्किंगसाठी मार्किंग करण्यात येणार
शहरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाच्या प्रश्नावर नगरपरिषद प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारपासून नाईक चौक ते अजिंठा चौक व चिंचपूररोड परिसरातील फेरीवाल्यांचे वीर सावरकर मैदान येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी पार्किंगसाठी मार्किंग करण्यात येणार असून वाहनधारकांनी त्याच मार्किंगमध्ये वाहने उभी करावीत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच बेशिस्त वाहनांवर कारवाई आणि नवी पेठेत पार्किंग व स्वच्छतागृह सुविधासुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिली.
यांची उपस्थिती
बैठकीस नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक अमोल गर्जे, बंडू बोरुडे, मुख्याधिकारी संतोष लांडगे व्यावसायिक राजेंद्र शेवाळे, सतीश गुगळे, बाळासाहेब जिरेसाळ, संतोष जिरेसाळ, डॉ.सुहास उरणकर,सागर दराडे, संतोष बाहेती,संजय पारखे, दिलीप गटागट, संतोष डांगा, दिलीप रोकडे, चंदन कुचरिया,प्रताप तांदळे,रितेश पटवा,धीरज गुंदेचा,अंबादास चव्हाण, विकास देसरडा, इजारे आदी उपस्थित होते


