
Rahuri–Shani Shingnapur Railway Line : राहुरी : शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे (Rahuri–Shani Shingnapur Railway Line) राहुरी तालुक्यातील बागायती व सुपीक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने हा रेल्वेमार्ग तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी राहुरीचे आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले (Akshay Kardile) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदनही त्यांनी सादर केले.
नक्की वाचा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका आमदार जगताप
शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या
राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आमदार कर्डिले यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडताना, प्रस्तावित रेल्वेमार्गाला राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. राहुरी तालुक्यातील सुपीक, बागायती व ऊसपट्ट्यातील मोठ्या क्षेत्रावर या रेल्वेमार्गाचा परिणाम होणार असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे विभाजन होण्याची तसेच त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कर्डिले यांनी सुचविल्या पर्यायी उपाययोजना (Rahuri–Shani Shingnapur Railway Line)
यापूर्वी विविध विकास प्रकल्पांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या असून, पुन्हा एकदा जमीन संपादनाच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका आमदार कर्डिले यांनी मांडली. विकासाला विरोध नसून, तो शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न आणता व्हावा, अशी भूमिका स्पष्ट करत प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्ग रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार कर्डिले यांनी पर्यायी उपाययोजनाही सुचविल्या.
योग्य तो मार्ग काढण्याचे दिले आश्वासन
शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राहुरी रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. तसेच राहुरी रेल्वे स्थानक ते शनिशिंगणापूर दरम्यान नियमित, सुसज्ज व वारंवार बससेवा सुरू करून भाविकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विषयावर सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार अक्षयदादा कर्डिले यांनी दिली.


