नगर : अखेर राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेला (Shikshak Bharti 2024) मुहूर्त सापडला आहे. राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार,अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया (Actual Process) सुरू झाली आहे.
नक्की वाचा : कर्नाटक सरकारने टॅक्सी सर्व्हिसचे भाडे केलं फिक्स
जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध (Shikshak Bharti 2024)
![](https://i0.wp.com/ilovenagar.com/wp-content/uploads/2024/02/Shikshak-Bharati-2024-1024x538.jpg?resize=696%2C366&ssl=1)
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. या चाचणीसाठी एकूण दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. या चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीसाठी शिक्षण सेवक, शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : झारखंडमध्ये चंपई सोरेनच मुख्यमंत्री
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली माहिती (Shikshak Bharti 2024)
![](https://i0.wp.com/ilovenagar.com/wp-content/uploads/2024/02/Shikshak-Bharati-1024x538.jpg?resize=696%2C366&ssl=1)
शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम, बिंदुनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांचा एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. सोशल मिडियावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबावाचा परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयावरील धोरणाचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भरतीच्या एकूण जागा जाहीर झाल्यानंतर सोमवारी(ता.५) पहिल्याच दिवशी जवळपास सात हजारांहून अधिक उमेदवारांनी प्राधान्यक्रम देखील दिला आहे.
ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असल्याने त्यात तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे, असेही मांढरे यांनी सांगितले.