
Appeal : नगर : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने संपूर्ण देश व राज्यात दि. २० मे २०२६ रोजी विविध मागण्यांसाठी बंदचे आवाहन केले असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हेही वाचा : माहीजळगाव शिवारात गावठी कट्टे बाळगणारा युवक जेरबंद; कर्जत पोलिसांची कारवाई
शासन आदेश बंधनकारक
घोषित बंदच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा’ आणि शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे, त्यांनी या संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. औषधांचा समावेश ‘अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५’ च्या कक्षेत होत असून, रुग्णांना औषधे न पुरवणे हे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच औषधांची मागणी करणाऱ्यास औषधांचा पुरवठा खंडित करणे हे ‘औषध किंमत नियंत्रण आदेश, २०१३’ तसेच ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ अंतर्गत नियमांचे उल्लंघन ठरू शकते. रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध होणे आवश्यक असून आकस्मिक परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व औषध विक्रेत्यांनी घ्यावी.
नक्की पहा : श्रीरामपूर मध्ये पुन्हा एकदा बिबट्या जेरबंद; पंधरा दिवसांत चार बिबटे जेरबंद
या क्रमांकावर संपर्क साधा (Appeal)
आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी सहायक आयुक्त (औषधे) जा. हु. शेख (भ्रमणध्वनी क्रमांक ८३२९९७५९५४) तसेच सहायक आयुक्त (औषधे) सो. बा. मुळे (भ्रमणध्वनी क्रमांक ९४०४४२६२३३) अथवा कार्यालयाच्या ०२४१-२४३०२४३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


