Parner-Supa State Highway : पारनेर : पारनेर शहरातून जाणाऱ्या पारनेर-सुपा राज्य मार्गाची (Parner-Supa State Highway) दुरवस्था झाली असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे या मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानक परिसर ते सय्यद हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नक्की वाचा : बोधेगाव येथे गावठी कट्टा बाळणारा जेरबंद; दोन जिवंत काडतुसांसह एक मॅगझीन हस्तगत
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पारनेर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात रस्ता उखडला आहे. रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत की, त्यात पाणी साचून वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात (Parner-Supa State Highway)
या मार्गावरील काही ठिकाणे आता अत्यंत धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. यामध्ये प्रामुख्याने: यशवंत हॉटेल परिसर, बँक ऑफ बडोदा समोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, हनुमान मंदिर शेजारील रस्ता, डॉ. सय्यद हॉस्पिटल परिसर, पारनेर ग्रामीण पतसंस्था समोर, ए.डी.सी.सी. बँक चौक या ठिकाणांवर रस्त्यावर खडी विखुरलेली असून मोठे खड्डे पडले आहेत. अनेकदा वाहनचालक खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या वाहनांना धडक देत आहेत. वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. पावसामुळे रस्ता अधिक खराब होत असून, खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन याकडे कधी लक्ष देते आणि दुरुस्तीचे काम कधी सुरू होते, याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.



