Rahuri Election : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट संवाद साधला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच कांदा काढणीसाठी काम करणाऱ्या शेतमजुरांशीही चर्चा केली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च, बाजारभाव, साठवणूक सुविधा आणि मजुरी यासंबंधीच्या अडचणी मांडल्या. अक्षय कर्डिले यांनी त्या बारकाईने ऐकत प्रत्येक प्रश्नावर शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य (Rahuri Election)
यावेळी त्यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून दिली. “स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आणि शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले. दूध उत्पादकांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवून त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, “शेतकऱ्यांची अडचण प्रत्यक्ष पाहूनच समजते. त्यामुळेच मी बांधावर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. तुमच्या प्रश्नांसाठी विधानसभेत ठामपणे आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतमजुरांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या कामाच्या अटी, मजुरी आणि रोजगाराच्या संधी याबाबतही माहिती घेतली. ग्रामीण भागातील कामगारांच्या प्रश्नांनाही प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
नक्की पहा : अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री विशाल गणपतीला हजारो आंब्यांची आरास
ग्रामीण भागातील प्रश्नांवर लक्ष (Rahuri Election)
या भेटीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उमेदवार थेट बांधावर येऊन संवाद साधत असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. एकूणच, पाथर्डी तालुक्यातील या दौऱ्यामुळे अक्षय कर्डिले यांनी शेतकऱ्यांशी थेट नाळ जोडत आपल्या प्रचाराला वेग दिला असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.



