Shri Ram Katha | नगर : माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काका ट्रस्टतर्फे अहिल्यानगरमध्ये एका विशेष वैचारिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काका ट्रस्ट आयोजित भारतातील सर्वात भव्य श्रीराम कथा (Shri Ram Katha)… ‘अपने अपने राम’ या महोत्सवाची शहरात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रसिद्ध वक्ते डॉ. कुमार विश्वास यांच्या सुमधुर वाणीतून अनुभवा प्रभू श्रीरामांची जीवनगाथा! असा हा अभूतपूर्व सोहळा अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच होत आहे. हा कार्यक्रम १९, २० आणि २१ एप्रिल २०२६ रोजी दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अहिल्यानगरमधील आनंदधाम रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय पाठशाळा मैदान येथे पार पडेल.

भव्य सोहळ्याचे आयोजन
स्व. अरुणकाका जगताप यांनी आपले संपूर्ण आयुष्य अहिल्यानगरच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वेचले. त्यांचे जनहित आणि सामाजिक बांधिलकीचे काय नेहमीच प्रेरणादायी राहले आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेला आणि पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी काका ट्रस्टने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. प्रभू श्रीरामांचे विचार आणि मूल्ये समाजात रुजावीत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण

राम विचारांचे महत्त्व
या तीन दिवसीय रामकथेत डॉ. कुमार विश्वास यांच्या ओघवत्या आणि काव्यमय शैलीतून प्रभू श्रीरामांचे जीवन दर्शन, रामायणातील प्रसंग आणि आजच्या आधुनिक काळात राम विचारांचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत उलगडले जाणार आहे. डॉ. विश्वास यांची कथा सांगण्याची विशिष्ट हातोटी आणि साहित्याची जोड यामुळे हा कार्यक्रम शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक वैभवात मोठी भर टाकणारा ठरणार आहे. तरुणाईलाही यातून योग्य दिशा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हे पहा – आगडगावमध्ये भरते भुतांची जत्रा
हा संपूण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीचा अंदाज घेऊन, कथेसाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रीय पाठशाळा मैदानावर भव्य मंडप आणि नियोजनबद्ध आसनव्यवस्था करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी काका ट्रस्टच्या वतीने दररोज जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, माता-भगिनींनी आणि तरुणांनी या सुश्राव्य कथेचा लाभ घ्यावा, प्रभू श्रीरामांच्या भक्ती, विचार आणि ज्ञानाच्या या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन काका ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.



