Child Marrigae : नगर : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या एका वर्षांच्या काळात व्यापक कारवाई करत १५५ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून बालविवाह रोखले. त्यापैकी ७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.
हेही वाचा : पाथर्डी-बीड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवक ठार
समन्वयातून केली कारवाई
मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व मुलाचे वय २१ वर्षपिक्षा कमी असल्यास तो विवाह कायद्याने दंडनीय ठरतो. अशा बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रशासन, महिला व बालविकास विभाग, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिक बालसंरक्षण समित्यांच्या समन्वयातून ही कारवाई राबविण्यात आली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह लावणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांत केवळ पालकांवरच नव्हे, तर विवाह सोहळा आयोजित करणारे, मध्यस्थ, नातेवाईक, मंडप डेकोरेशन व्यावसायिक, बॅण्डपथक तसेच संबंधित सेवा पुरवठादारांवरही कारवाई केली जाते.
नक्की पहा : कोपरगावात कोल्हे-काळे गट आमने-सामने
तालुकानिहाय कारवाई (Child Marrigae)
अहिल्यानगर १९, पाथर्डी १९, श्रीगोंदा १७, शेवगाव १५, कर्जत १४, राहुरी १२, नेवासा ११, संगमनेर, पारनेर ९, राहाता ९, कोपरगाव ७, जामखेड ६, अकोले ६, श्रीरामपूर २ या तालुक्यातील बालविवाहांना प्रतिबंध करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ग्राम बाल संरक्षण समित्यांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील, शिक्षक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.



